
मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकास आराखड्यावरून महाविकास आघाडीत अदानींमुळे पुन्हा एकदा खडा पडण्याची शक्यता निर्माण झालीय. अदानी समूहाला पुनर्विकास प्रकल्प देण्यावर ठाकरेंनी आक्षेप घेतलाय. या विरोधात सोळा तारखेला ठाकरे गट अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. ठाकरे यांनी नेमका हा इशारा का दिला? धारावी पुनर्विकास प्रकल्प काय आहे? त्यावरून का वाद होताहेत? हे समजून घेऊ. आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी आहे. मुंबईच्या बरोबर मध्यवर्ती भागात तब्बल सहाशे एकरवर धारावी झोपडपट्टी वसलेली आहे. इथे किमान साठ हजार झोपड्या आहेत. ज्यामध्ये दहा लाखाहून जास्त लोक राहतात. मातीच्या वस्तू, कपडे, शिलाई, लेदर असे हजारो व्यवसाय धारावीमध्ये आहेत. धारावीचा पुनर्विकास हा भारतातला सगळ्यात मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरेल.
धारावीतल्या जवळपास साडे सहा लाख पात्र लोकांना झोपडपट्ट्यांच्या मोबदल्यात घरं दिली जाणार आहेत. रेल्वेच्या पंचेचाळीस सत्तेचाळीस एकर जमिनीवर लाभार्थ्यांचं पुनर्वसन होईल. अदानी समूहाच्या अदानीजला पुनर्विकासाचं काम महाराष्ट्र सरकारनं दिलंय. पाच हजार एकोण सत्तर कोटींची बोली लावून अदानी समूहानं हा प्रकल्प मिळवलाय. पण, पूर्ण प्रकल्प होण्यास अंदाजे तेवीस हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
धारावीचं पुनर्वसन झाल्यानंतर विकासकाकडे वीस ते तीस टक्के जमीन शिल्लक राहते. ज्याचं क्षेत्रफळ हे अंदाजे तीस लाख चौरस फुट इतकं असेल असं बोललं जातं. मात्र, प्रकल्पाचा विकास आराखडा कसा असेल? इथल्या लघु उद्योजकांचं काय होईल? अदानी या खाजगी समूहाऐवजी सरकारी संस्था, पुनर्विकास का करत नाहीत? धारावीकरांना पाचशे स्वेअर फुटांची घरं दिली जावीत, असे अनेक आक्षेप यामध्ये घेतले जात आहेत.
धारावीच्या याच प्रकल्पावरून महाविकास आघाडीमध्ये त्रांगडं निर्माण झालंय. कारण, धारावी प्रकल्प अदानींना दिल्यानंतर त्याला ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. त्यावर, उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या शंका समजून घेऊन गैरसमज दूर केला जाईल असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. पण आता तर उद्धव ठाकरे यांनी धारावी प्रकल्पाबद्दल माझे गैरसमजच असावेत असं म्हणत अदानींविरोधात मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं म्हटलंय.
धारावीवरती एवढ्या सवलती त्यांनी उधळल्या आहेत की त्याचा फायदा जर गरिबांना मिळणार असेल तर आनंद आहे. पण तो जर का तुमच्या मित्राच्या खिशात जाणार असेल तर तो मात्र आम्ही जाऊ देणार नाही. मुंबई काय धारावीसुद्धा त्याला गिळू देणार नाही हा निश्चय करून आम्ही रस्त्यावरती उतरू, असे आव्हान ठाकरे यांनी दिलंय.

