
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पहाटे कारचा भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मारुती सुझुकी अर्टिंगा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्ण चक्काचूर झाला. समोरून कारची थेट धडक बसून कारचे मोठे नुकसान झाले. कार ढेकू गावाजवळून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून अज्ञात वाहनाची मागून धडक बसली.
कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. 3 गंभीर जखमी असून एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. कारमधील लोक वेगवेगळ्या ठिकाणचे होते. सर्वजण मुंबईच्या दिशेने जात होते. अपघातानंतर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
रुग्णालयात जात असताना आणखी 1चा मृत्यू, चालकासह 2 जणांवर उपचार सुरू
जखमींना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. चालकासह अन्य दोन जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये अब्दुल रहमान खान (वय- 32) हा घाटकोपर, मुंबईचा रहिवासी होता. वसीम साजिद काझी हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील रहिवासी होता. राहुल कुमार पांडे (30) हा नवी मुंबई (फ्लॅट क्रमांक 605, रिद्धेश्वर हौसिंग सोसायटी, कामोठे), आशुतोष नवनाथ गांडेकर (23 वर्षे) अंधेरी पश्चिम (अशोक धर्मा चाळ, म्हातरपाडा, आंबोली), मुंबई येथील रहिवासी होता. याशिवाय अनिल सुनील सानप याच्या नावाचाही मृतांमध्ये समावेश आहे.
मृत आणि जखमींची नावे आणि ओळख
जखमींमध्ये चालक मच्छिंद्र अंभोरे (३८), अमिरुल्ला चौधरी आणि दीपक खैराल यांचा समावेश आहे. असफिया रईस चौधरी (२५) असे किरकोळ दुखापत झालेल्या महिलेचे नाव असून ती मुंबईतील कुर्ला भागातील रहिवासी आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता. यानंतर क्रेनच्या सहाय्याने गाडी रस्त्यावरून हटवण्यात आली.

