
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. लोकसभेचे मैदान आता चांगलेच रंगणार आहे. महाराष्ट्रात सहा पक्षांच्या दोन आघाड्यांमध्ये खरी लढत आहे. त्याचवेळी शरद पवार यांचा गड असलेल्या बारामतीमध्ये निवडणूक घोषणा होण्याआधीच चुरस निर्माण झाली आहे. आता शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांचा काय आग्रह आहे, हे सांगितले. कार्यकर्ते मला पुणे, सातारा किंवा माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. ट्विटच्या माध्यमातून बोचरा प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर
”बारामतीची गढी वाचवायची असेल तर तुम्हालाच मैदानात उतरावे लागेल असे कोणी कानात सांगितले आहे का? पण तुम्ही उतरलात तरी घडायचे ते घडणारच…,” असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. अतुल भातखळकर यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा महायुतीच्या जागा वाटप दरम्यान होणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून प्रचार जोरात सुरु आहे.
शरद पवार काय म्हणाले होते
मोतीबागेत शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, कार्यकर्ते आग्रह करत आहे. मी पुणे, सातारा किंवा माढा मतदार संघातून निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा आहे. माझ्या राजकीय जीवनात 14 निवडणुका लढलो आहे. या सर्व निवडणुका मी जिंकलो आहे. आता आणखी निवडणूक लढवण्याची आपली इच्छा नाही. यासंदर्भात मी यापूर्वीच लोकसभा निर्णय घेतला आहे. तो जाहीर केला आहे.
शरद पवार यांच्यासाठी चांगली बातमी
स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांचे जवळचे सहकारी राहिलेले सुनील माने शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहे. मोतीबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार प्रवेश सोहळा होणार आहे. ते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.

