
राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. एकूण 2359 ग्राम पंचायती आहेत. त्यातल्या 1100 पेक्षा जास्त ग्राम पंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. शिंदे गटापेक्षा अजित पवार गट सरस ठरलाय. सर्वात मोठा फटका ठाकरे गट आणि शरद पवार गटाला बसला आहे. महायुतीने राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत बाजी मारली आहे. महायुतीने आतापर्यंत 688 पेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीने कसाबसा 200 चा टप्पा ओलांडला आहे.
दरम्यान महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील ग्राम पंचायतीचे निकाल रोहित पवार यांच्यासाठी धक्कादायक आहेत. कर्जत-जामखेड मतदार संघाचे संपूर्ण निकाल जाहीर झाले आहे. रोहित पवार यांचे विरोधक राम शिंदे यांची सरशी झाली आहे. मागच्यावेळी विधानसभेला रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता.
कर्जत-जामखेडचा कौल काय?
कर्जत आणि जामखेड मिळून एकूण 9 ग्राम पंचायतीचे निकाल हाती आले आहेत. भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्याकडे 5 जागा, तर आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 जागा आहेत. 1 ग्राम पंचायत अजित पवार गटाकडे आहे. तर 1 स्थानिक आघाडीकडे आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा विचार करता हे आकडे रोहित पवार यांच्यासाठी फारसे चांगले नाहीयत. कारण ग्रामपंचायत निवडणूक निकालातून मतदारांचा कल कुठल्या दिशेला आहे, ते कळून येतं.

