
महाराष्ट्रातून रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 6 जागांपैकी 2 जागांवर शिवसेना आपले उमेदवार उभे करत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी याला अधिकृत दुजोरा दिला. यावेळी छत्रपती संभाजी राजे यांनाही शिवसेनेकडून राज्यसभेचे तिकीट मिळणार का, असा प्रश्न राऊत यांना विचारला असता, त्यांनी याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले.
शिवाजी महाराजांच्या तेराव्या पिढीतून येणाऱ्या संभाजी राजेंसमोर शिवसेनेने पक्षात येण्याची अट ठेवल्याची चर्चा आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे राजे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, इतर पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते गेल्या अनेक दिवसांपासून पक्षप्रमुखांची भेट घेत आहेत. राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
‘राजे आणि उद्धव यांच्या भेटीवर सस्पेन्स कायम’
संजय राऊत म्हणाले की, छत्रपती संभाजी राजे आज मुख्यमंत्री उद्धव यांची भेट घेणार होते. आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही शिवसेनेत जा, यामुळे राज्यसभेत आमच्या पक्षाची संख्या वाढेल, पण ते आता मुख्यमंत्र्यांना भेटतील की नाही हे मी सांगू शकत नाही.
‘आमचाच उमेदवार, मग राजेंना पाठिंबा कसा देणार’
संभाजी राजे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते छत्रपती आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेसाठी विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, संभाजी राजेंना अपेक्षित मते नाहीत. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची मागणी केली होती. शिवसेनेचा स्वतःचा उमेदवार असताना आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा कसा देणार? त्यामुळेच आम्ही त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.
महाराष्ट्रात या सहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे.
महाराष्ट्रातील पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे आणि विकास महात्मे (भाजप), पी चिदंबरम (काँग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) आणि संजय राऊत (शिवसेना) या सहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ४ जुलै रोजी संपत आहे. या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे.
शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल : शरद पवार
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती किंवा शिवसेनेने निवडलेल्या कोणत्याही उमेदवाराला त्यांचा पक्ष पाठिंबा देईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

