कंस मामा राख्या बांधत फिरतोय, बहिणीवर अत्याचार होतो आणि निर्लज्ज…’, उद्धव ठाकरेंचा संताप

By Abhishek Raghuvanshi
3 Min Read

“अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याही पेक्षा त्यांच्या पापावर पांघरूण घालणाऱ्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे. मग तो मराठा समाजाचा विषय असेल, एसटीचा विषय असेल ही काही माणसं राज्यकर्त्यांची सदा आवडती झाली आहेत. त्यांची लायकी काय माहीत आहे. तुम्ही केलं ते शोभा देणारं नाही. तुम्ही राजकारण आणलं. आज संपूर्ण घरातील महिला जाब विचारत आहेत. तुम्ही का आड येत आहेत?” असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाने मविआने पुकारलेला महाराष्ट्र बंद बेकायदा ठरवला. त्यानंतर आज ठाकरे गटाकडून दादरच्या शिवसेना भवन परिसरात निषेध आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

आजचं आंदोलन संपता कामा नये. तुम्ही झेंडे घेऊन आलात. पुढचे काही दिवस, शहरात, गावात सार्वजनिक चौकात स्वाक्षरी मोहीम सुरू करा. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित. आम्हाला सुरक्षित बहीण हवी. गेल्या काही दिवसांचा मी काल घटनांचा क्रम वाचून दाखवला. रोजा काही ना काही घडत आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मुंबईत घडतंय, बदलापूर , सोलापूर आणि सांगलीत घडतंय. कंस मामा भाचीला न्याय कधी देतोय, कंस मामा सर्व राख्या बांधत फिरत आहे. बहिणीवर अत्याचार होत आहे आणि निर्लज्ज राख्या बांधत आहेत. राखी बांधण्यात आडकाठी येऊ नये म्हणून आमच्या आंदोलनात आडकाठी करत आहात. एवढं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं” असं उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हणाले.

‘बंद का करत आहोत. हे दाखवायचं आहे’

“हा महाराष्ट्र साधूसंतांचा आहे. फुले, शाहू, शिवाजी महाराज आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ही नावे तोंडी लावायला घेत नाही. हा संस्कारीत महाराष्ट्र आहे. एका बाजूला विकृत आणि नराधम आहे. त्यावर पांघरूण घालणारं विकृत सरकार आहे. त्यांच्याविरोधातील हा लढा आहे. आजपासून गावात मुख्य चौकात स्वाक्षरी घ्या. जेवढ्या स्वाक्षऱ्या गोळया करून सर्वोच्च न्यायालयाला पाठवत आहोत. बंद का करत आहोत. हे दाखवायचं आहे. तुम्ही बंद केला तरी आमचा आवाज कुणीही बंद करू शकत नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

‘शक्ती कायद्यावरची धुळ झटका आणि तो अंमलात आणा’

“सरकार माताभगिनींचं रक्षण करण्यास असमर्थ असेल अत्याचार करत असेल तर आम्ही आमच्या माताभगिनींचं रक्षण करायला आम्ही सज्ज आहोत. जो शक्ती कायदा आपण केला होता. तो राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. त्यांनाही आवाहन करत आहोत की शक्ती कायदा धुळखात पडला आहे. त्यावरील धुळ झटका आणि तो अंमलात आणा” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version