आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासोबत रायगड जिल्ह्यात बेकायदेशीरपणे जमीन खरेदी केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे रवींद्र वायकर अडचणीत आले होते. या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली होती. आज अचानक ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकरांच्या घरी आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. सकाळी सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकरांशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. काय आहे नेमकं हे प्रकरण आणि साधा शिवसैनिक ते गृहनिर्माण राज्यमंत्रीपदापर्यंतचा वायकरांचा कसा झाला प्रवास? हे जाणून घेऊ या…
20 वर्षे नगरसेवक
रवींद्र दत्ताराम वायकर हे 65 वर्षाचे आहेत. साधा शिवसैनिक ते गृह निर्माण राज्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे. 1992मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत. या काळात ते सलग तीन वेळा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षही होते.
अभ्यासू नेता, प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव
मुंबई महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक राहिलेल्या वायकर यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशासनाकडून काम करून घेण्याची त्यांची हातोटी आहे. महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची त्यांच्यावर खास मर्जी असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
उद्धव ठाकरेंच्या मर्जीतील नेते
उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख आहे. त्यांची काम करण्याची प्रवृत्ती आणि अभ्यासूपणा यामुळेच ते उद्धव ठाकरे यांच्या खास जवळचे आहेत.
गृहनिर्माण राज्यमंत्रीपदी वर्णी
2014 मध्ये युतीचं सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांची गृहराज्य मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली होती. आपल्या कार्यकाळात वायकर यांनी गृहनिर्माण धोरण अधिक सोपं करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.
मुख्यमंत्री कार्यालयात चीफ कोऑर्डिनेटर
राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना कॅबिनेटपदी बढती मिळेल अशी शक्यता होती. परंतु, रवींद्र वायकर यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे वायकर प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना ऑफिस का चीफ कोऑर्डिनेटर करून त्यांची नाराजी दूर केली होती.
पहिला आरोप
वायकरांवर सर्वात पहिल्यांदा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आरोप केला होता. वायकर आणि मातोश्रीचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप निरुपम यांनी केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र निरुपम यांना हे आरोप सिद्ध करता आले नव्हते.
वायकर आणि जीमचा वाद
वायकर यांनी आरे कॉलनीत बेकायदा जिमखाना आणि 40 खोल्या असलेली इमारत बांधल्याचा आरोपही संजय निरुपम यांनी केला होता. 20 एकर जागेत जिमखाना आणि 40 खोल्या असलेल्या इमारतीचे बेकायदा बांधकाम केल्याचा दावा निरुपम यांनी केला होता. या प्रकरणी लोकायुक्त एम. एल. टाहलियानी यांच्यापुढे सुनावणी झाली होती. त्यावर तपासाचे आदेश देण्यास लोकायुक्तांनी नकार दिला होता. मात्र, जिमखान्याची जागा परत घेऊन आदिवासी आणि झोपडपट्टीवासीयांसाठी त्याचा वापर करण्यात यावा, असे लोकायुक्तांनी स्पष्ट केले होते. तर, वायकर यांनी आपली बदनामी केली जात असल्याचे सांगून निरुपम यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध 10 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.
सोमय्यांचे आरोप
अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांची पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती.
वायकरांचा पलटवार
सोमय्यांच्या या आरोपांवर वायकरांनी पलटवार केला होता. हे फाल्तू आरोप आहेत. कुणी कुणाकडून जमीन घेऊ शकत नाही का? हा माझा पहिला प्रश्न आहे. जमीन घेतलेली आहे. त्याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला दाखवली आहे. इन्कम टॅक्समध्ये त्याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे जमीन घेतली आणि त्याची माहिती लपवून राहिली, असा प्रश्नच येत नाही. जमीन घेतलेली आहे”, असं वायकर म्हणाले होते. ठाकरे आणि वायकर कुटुंब एकत्र व्यव्हार का करु शकत नाहीत? उद्धव ठाकरे माझे नेते आहेत. तुम्ही चौकशी करा आम्ही किती जमीन एकत्र घेतली आहे. त्याबाबत इन्कम टॅक्सला माहिती दिली आहे. आता त्याची माहिती सोमय्यांना द्यायला हवी का?, असा सवालही त्यांनी केला होता.
ठाकरे-वायकरांविरोधात तक्रार
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि वायकरांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 402 पानाची ही तक्रार आहे. ठाकरे-वायकर यांनी सत्तेचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी या तक्रारीत केला आहे. दोघांनीही वन विभागाच्या जागेवर अतिक्रम करून अनधिकृतपणे घरे बांधल्याचा आरोप केला असून या प्रकरणात सात दिवसात कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (who is Senior Shiv Sena leader ravindra waikar?)
आता धाड का?
आज ईडीने वायकर यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर धाडी मारल्या. यात वायकर यांच्या घरासह कार्यालयांचा समावेश आहे. एकूण 12 अधिकारी वायकर यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी करत आहेत. वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळ्यात वायकर यांचा हात असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या गार्डनच्या जागेवर बांधकाम झाल्याची तक्रार आहे. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात पालिकेच्या भूखंडावर हे बांधकाम झाल्याचा आरोप आहे. पालिकेच्या भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली. तिची किंमत 500 कोटींच्या घरात असल्याचादावा भाजप नेत्यांनी केला आहे. या प्रकरणातच वायकर यांच्या घरावर धाडी मारण्यात आल्या आहेत.
