उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मुंबईतून महायुतीने काल उमेदवारांची नाव जाहीर केली. बऱ्याच दिवसांपासून या दोन जागांबद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबई या दोन जागा भाजपाकडे जाणार असा अंदाज वर्तवला जात होता. पण या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्या आहेत. दक्षिण मुंबईतून आमदार यामिनी जाधव यांना, तर उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी भाजपा आमदार अमित साटम यांचं तसच काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या संजय निरुपम यांचं नाव चर्चेत होतं. उमेदवारी मिळवण्यासाठी संजय निरुपम शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती.
पण अखेर शिवसेना शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिलीय. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होते. ईडीकडून छापेमारीची कारवाई झालेली. मात्र, असं असूनही शिवसेना शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिलीय.
कुठल्या दोन उत्तर भारतीय नेत्यांमधील लढाई?
रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका भाजपा नेत्याने संजय निरुपम यांच्यावर निशाणा साधला आहे. “संजय निरुपम यांना रवींद्र वायकर यांचं निवडणूक प्रमुख बनवलं पाहिजे. संजयजी मागची लोकसभा निवडणूक तिथून लढले होते. त्यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची पूर्ण माहिती आहे. संजय निरुपम यांचा आता भरपूर उपयोग होऊ शकतो. त्यांना शिवसेनेत घेतलं पाहिजे. वायकर यांचं कार्यालय आणि निवडणूक प्रमुख बनवलं पाहिजे” मोहित कंबोज यांनी असं उपहासात्मक टि्वट केलय. खरंतर ही दोन उत्तर भारतीय नेत्यांमधील लढाई आहे.
