विकृत पुरुषांना जगण्याचा अधिकार…; बदलापूर अत्याचार प्रकरणावर सिद्धार्थ चांदेकरची संतप्त पोस्ट

By Abhishek Raghuvanshi
2 Min Read

कोलकात्यातील डॉक्टर तरूणीवरील अन्यायाची घटना ताजी असतानाच बदलापूरमध्ये संतापजनक घटना घडली आहे. साडे चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. शाळेतील शौचालयातील सफाई कामगाराने या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत न्यायाची मागणी केली. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. कलाक्षेत्रातूनही या घटनेचा निषेध केला जात आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानेही या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत त्याने संताप व्यक्त केला आहे.

सिद्धार्थ काय म्हणाला?

बदलापूरमधील चिमुकल्यांच्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. यावर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने याबाबत इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केलीय. आता बोला की मुलींनी आपली संस्कृती जपली पाहिजे, म्हणजे कुणी तुमच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही… त्या लहान पोरींना तर संस्कृती या शब्दाचा अर्थही माहीत नसेल. स्कूल युनिफॉर्ममधल्या 3- 4 वर्षांच्या मुली आहेत त्या! या चिमुकल्या जीवांवर अत्याचार करणं ही विकृती आहे. या विकृत पुरुषांना ‘मानवी हक्क’ नसावेत! कसलाही अधिकार नसावा! जगण्याचाही!, अशी पोस्ट सिद्धार्थने इन्टाग्रामवर शेअर केलीय.

बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?

बदलापूर इथल्या आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शौचालयातील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे स्थानिक लोक आक्रमक झाले. त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. बदलापूर रेल्वे 11 तास झालेल्या रेलरोकोने महाराष्ट्रासह देशाचं लक्ष वेधून घेतलं. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे.

- Advertisement -

कोलकात्यातील बलात्कार प्रकरणावरही सिद्धार्थ चांदेकरने एक व्हीडिओ शेअर केला होता. यात त्याने मुलांवर संस्कारांची गरज असल्याचं म्हटलं होतं. मला वाटतं ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’हे आपण आता बोलायला नको. मुलगी शिकतेय, तिला शिकू दिलं जात नाहीये. ती प्रगती करण्याची धडपड करतेय, तिची प्रगती होऊ दिली जात नाहीये. आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी सातच्या आत घरात परत येतेय की नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सातनंतर कुठे जातो, काय करतो, काय संगत आहे त्याची, कोणाशी बोलतोय, काय विचार आहेत त्याचे.. हे बघणं जास्त गरजेचं आहे. खरंच या देशातला मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला तर या देशाची प्रगती झाली, असं सिद्धार्थ म्हणाला होता.

Exit mobile version