“राज्याचा गृहमंत्री युजलेस, साधं निवदेन सोडा, संवेदनाही नाही”

By Abhishek Raghuvanshi
3 Min Read

 राज्यात सध्या हिट अँड रन प्रकरणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी वरळीत एका महिलेला क्रूरपणे गाडीखाली चिरडण्यात आले. याप्रकरणी शिंदे गटाचा नेता राजेश शाहाचा मुलगा मिहिर शाहाला तीन दिवसांनी बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्यासह त्याला पळून जाण्यात मदत करणारे कुटुंबिय आणि मित्रालाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 10 लाखांची मदत पीडित कुटुंबाला जाहीर करण्यात आली आहे. आता याप्रकरणी SIT चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घणाघात केला आहे.

“जोपर्यंत आरोपी आणि त्याचे कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काहीही किंमत नाही. त्या कावेरी नाखवा यांचा जीव दहा लाखाचा आहे का, असं काही झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतात. त्या काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे की ते खोकेवाले आहेत?” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत”

“आले की पैसे वाटायचे. याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा. कायदा सुव्यवस्था या रस्त्यात नग्न झालेली आहे. चिरडून मरत आहे. या राज्याचे गृहमंत्री युजलेस गृहमंत्री आहेत. आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईत घडली. गृहमंत्र्यांनी साधं निवदेन सोडा, संवेदनाही व्यक्त केली नाही. अशाप्रकारचा गृहमंत्री राज्याला मिळालाय, हे दुर्दैव आहे. गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहे. गृहमंत्री म्हणून स्वत:ची असलेली जबाबादारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाही?” असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मुंबईच्या रस्त्यावर एक महिला चिरडून मारली जाते. तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही. आक्रोश कानापर्यंत पोहोचत नाही. फक्त पैसे दिले, पैसे दिले असं ओरडतात. तुमची ही पैशांची मस्ती मुंबईतील जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. शिंदे, फडणवीस यांनी हे लक्षात घ्या. ते हॉटेल आणि सर्व बेकायदेशीर आहे मुळात हे सरकारच बेकायदेशीर आहे, हे मिंधे सरकारच घटनाबाह्य आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हिट अँड रन प्रकरणात नेमकं काय घडलंय?

दरम्यान वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला 9 जुलैला अटक करण्यात आली. त्याला आज पोलिसांनी कोर्टात हजर केलं. हा अपघात झाला. तेव्हा आपण स्वत: गाडी चालवत असल्याचं मिहिरने मान्य केलं. जुहूतील तपस बारवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. बुलडोझरच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. बारमधील अवैध बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.

Exit mobile version