मराठा समाजालाही आता ओबीसींमधून आरक्षण मिळणार असल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ चांगलेच संतापले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात मी एकाकी नाही. देशातील आणि राज्यातील करोडो ओबीसी बांधव माझ्यासोबत आहेत, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. आमच्या आरक्षणात आता बलदंड लोक आले आहेत. ते आमचं आरक्षण घेऊन जातील. आमचं आरक्षण संपुष्टात आलं आहे. हे सांगायला तत्त्वज्ञान मांडायची गरज नाही, असा संतापच भुजबळ यांनी व्यक्त केला.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरकारमध्ये राहून तुम्ही आरक्षणाची लढाई लढणार की बाहेर पडून आरक्षणाची लढाई लढणार असा सवाल केला. या सवालावर भुजबळ भडकले. ते माझ्या पार्टीने ठरवावं. मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मला त्याची काही चिंता नाही. मला ओबीसी प्रश्नाचं दु:ख आणि संताप आहे. त्यापुढे कोणतीही अभिलाषा नाही. त्यांना जाऊ सांगा तुम्हा यांना काढा म्हणून, असा संताप छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
मंत्रिपदाचा संबंधच नाही
तुम्हाला वाटतं का? आम्ही जाणीवपूर्वक आरक्षणावर बोलतोय? आमच्या ओबीसीत बॅकडोअर लोक घुसवले जात आहेत. ते मी जाणीवपूर्वक केलंय का? कोण करतंय हे? त्याचा विचार करा. यात काय पीएचडी करायची गरज आहे? वाटेल त्यांना तुम्ही कुणबी सर्टिफिकेट दिलं जात आहे. चांगलं घर असलं तरी झोपडी दाखवली जात आहे. शिक्षण असलं तरी नाही म्हणून सांगितलं जात आहे. नोकरी असली तरी दाखवली जात नाही. घरासमोर गाडी ट्रॅक्टर असली तरी मोलमजुरी करता म्हणून सांगितलं जात आहे. इथे मंत्रिमंडळाचा हुद्द्याचा कसलाही संबंध नाही. ओबीसी बांधवांचं भटक्यांचं कित्येक वर्षानं मिळणारं आरक्षण समाप्त होतंय याची आग मनात भडकत आहे, असा संतापही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
