तुम्ही कुठे कुठे जाता हे सर्व उघड करू, दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा

By Abhishek Raghuvanshi
2 Min Read

राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांना अत्यंत कमी वयात मंत्रीपद मिळालं. त्यावेळी ते काही करू शकले नाहीत. त्यांनी एवढे बोलू नये. कारण त्यांच्या मागे ठाकरे आडनावाचे वलय आहे. तुमच्या मागे ठाकरे आडनावाचे वलय असल्याने कोणी बलोत नाहीत. जर लोक बोलायला लागले तर अवघड होईल. तुमचे सगळे धंदे बाहेर येतील. तुम्ही कुठे कुठे जाता, कोणत्या ज्योतिषाकडे जाऊन हात दाखवता हे सर्व आम्हाला माहीत आहे, असा इशाराच राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिला.

दीपक केसरकर हे मीडियाशी संवाद साधत होते. आलिशान महालात बसून गरिबीच्या गोष्टी होत नाहीत, असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावतानाच संजय राऊत यांच्या बद्दल काही लिहून त्यांना कशाला मोठे करायचे? संजय राऊत यांच्यामुळेच युती तुटली आहे, असा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे.

जयंत पाटील कुठेही जाऊ शकतात

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजितदादा गटात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. शरद पवार यांना धक्का बसणार आहे. पण जयंत पाटील हे मोठे नेते आहेत. त्यांना जिथे जायचे तिथे ते जाऊ शकतील. अनेक मोठ्या नेत्यांना लोक भेटतात, आपली इच्छा व्यक्त करतात, असं केसरकर म्हणाले.

सरकारला फोडणार

आदित्य ठाकरे हे काल ठाण्यात होते. यावळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार चिंधी चोरांचे आहे. हे खोके सरकार आहे. राज्यात पेपरफुटी प्रकरण होत आहे. सरकारी पदे भरली जात नाही. मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला नोकर भरतीसाठी वेळ मिळत नाही. गुजरातला उद्योगधंदे जात आहेत, असं सांगतानाच पेपर फुटत आहेत तसे आम्ही येणाऱ्या काळात या सरकारला फोडणार, असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी दिला.

- Advertisement -

हे सुटबुटातील सरकार

या सरकारच्या काळात तरुण, वंचित, गरीब, शेतकरी आणि सामान्य लोक हैराण आहेत. हे आपलं सरकार नाही. हे सुटबुट सरकार आहे. जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काही घेणंदेणं पडलेलं नाही, असा हल्लाच आदित्य ठाकरे यांनी चढवला.

Exit mobile version