काळा आला होता पण वेळ नाही, उल्हास नदीच्या पुरातून वाचवले तरुणाचे प्राण, बचाव पथक आले वेळीच धावून

By Abhishek Raghuvanshi
3 Min Read

कर्जत तालुक्यातील एक थरार कॅमेऱ्यात चित्रबद्ध झाला आहे. सध्या मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. आजुबाजूच्या नद्या नाल्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. त्यातच कर्जत तालुक्यातील टाकवे येथील एक तरुण उल्हास नदीच्या महापूरात अडकला. पाणी त्याला वाहून नेत असताना त्याने हिंमत हारली नाही. तो जगण्यासाठी धडपड करत होता. त्याच्या या हिंमतीला तात्काळ बचाव पथकाने साद दिली. त्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले.

पुराच्या पाण्यात अडकला

कर्जत तालुक्यातील टाकवे येथील आदिवासी तरुण गणेश पवार हा कामासाठी घराबाहेर निघाला आणि महापुराच्या पाण्यात वाहून गेला. पोहता येत असल्याने उल्हास नदीला पूर आलेला असताना देखील जिद्दीने नदीतून वाट काढत झाडाची मदत घेतली आणि तेथे तग धरून थांबून राहिला. त्यानंतर बचाव पथकाने महापुराने वाहत्या पाण्यात उतरून त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले.

पाण्यात पडला तरुण

- Advertisement -

कामानिमित्त घराबाहेर पडलेला तालुका कडाव जवळील टाकवे गावातील आदिवासी तरुण गणेश पवार हा पाण्यात कोसळला. उल्हास नदीचे पात्रात बेंडसे येथे हा तरुण वाहत जात असल्याचे नदीच्या कडेला महापूर पाहण्यास आलेल्या स्थानिकांनी पाहिले. सर्वत्र आरडाओरड सुरू असताना हा तरुण जिद्दीने महापूर आलेल्या उल्हास नदी मधून वाट शोधण्याचा प्रयत्न करीत होता. पोहता येत असल्याने हा तरुण चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या नदी मधून वाट काढत बेंडसे गावाजवळ नदी मधून एका बाजूला पोहचला. त्यावेळी नदीचे कडेला उभे असलेल्या शेकडो लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. मात्र आजूबाजूला पाणी असताना न डगमगता त्या तरुणाने नदीच्या कडेला वाढलेल्या झाडांचा आसरा घेतला.त्यामुळे आजूबाजूला पाणी असून तो पुढे वाहून गेला नाही.

बचाव पथक आले धावून

ही माहिती मिळताच कर्जत तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांनी खोपोली येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. या टीमचे सदस्यांनी गुरुनाथ साठलेकर यांच्या नेतृत्वाखाली किमान ३०० मिटर आत जावून झाडाच्या साहाय्याने पुरातून वाचण्याचा प्रयत्न करीत असलेल्या त्या तरुणाला बाहेर सुखरूप काढले.

बदलापूर शहरावरचं पूर संकट टळलं

बुधवारी रात्रीपासून पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. धोक्याच्या पातळीच्याही वर उल्हास नदीची पाणी पातळी पोहोचल्यानं बदलापूर शहराच्या नदी किनाऱ्यालगतच्या भागात उल्हास नदीचं पाणी घुसलं होतं. मात्र सुदैवानं रात्रीपासून पावसानं उसंत घेतल्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. उल्हास नदीची इशारा पातळी 16.50 मीटर आणि धोका पातळी 17.50 मीटर असून सध्याची पाणी पातळी 14.70 मीटर इतकी आहे. त्यामुळे बदलापूर शहरावरचं पूर संकट टळलं आहे.

Exit mobile version