मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याविरुद्धच्या खंडणी प्रकरणी सीबीआयने त्याला चौकशीसाठी समन्स बजावले असतानाच दुसरीकडे आता आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे. इंडीया टुडे या इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, एका परदेशी नागरिकाने त्याच्यावर मोठा आरोप केला आहे. ब्रिटीश नागरिक करण सजनानीने आरोप केला आहे की, समीर वानखेडे याने छापेमारीत त्याला अटक केली होती. यादरम्यान गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांचे 30 लाख रुपये किमतीचे रोलेक्स डेटोना घड्याळ चोरले. आश्चर्याची बाब म्हणजे हे घड्याळ नंतर अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या वस्तूंमध्येही दाखवले नाही.
या आरोपानंतर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण महागड्या घड्याळांच्या खरेदी-विक्रीप्रकरणी एनसीबीचे दक्षता पथक त्याच्याविरुद्ध आधीच चौकशी करत आहे. यादरम्यान हे घड्याळ कसे मिळाले हे तो सांगू शकला नाही. दुसरीकडे, करण सजनानीचा दावा आहे की छाप्यानंतर चौकशीदरम्यान अधिकारी आशिष रंजनने त्याच्याकडून 30 लाख रुपये किमतीचे रोलेक्स घड्याळ काढून घेतले आणि नंतर ते जप्त केलेल्या वस्तूंमध्ये दाखवले नाही. या प्रकरणाचे आयओ आशिष रंजन होते.
‘आमच्याशी जशी वागणूक झाली तशीच वागणूक समीर वानखेडेला द्यावी’
याशिवाय करण सजनानीने सांगितले की तो समीर वानखेडे, केपी गोसावी आणि सॅनविले डिसोझा यांना ओळखतो. जानेवारी २०२१ मध्ये जेव्हा त्यांच्या घरावर छापा टाकला तेव्हा ते दोघेही समीर वानखडे यांच्यासोबत होते, असे त्यांनी सांगितले. या सर्व गोष्टींसाठी समीर वानखेडेवर कारवाई व्हायला हवी, असे करणचे म्हणणे आहे.
त्यांनी आमच्याशी जशी वागणूक दिली तशीच त्यांना वागणूक दिली पाहिजे. ड्रग्ज प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर वानखेडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे सजनानी यांचे म्हणणे आहे.
