ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ‘सुलतान’ असा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातील सामान्य माणूस संकटात आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवडणूक पर्यटन सुरु आहे. राज्यातील सुलतान दुसऱ्या राज्यातील प्रचारात दंग आहेत. इकडून तिकडे खोके पोहोचवणं हेत या सुलतानांचं काम आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतायेत. नाशकापासून नंदुरबारपर्यंत अशीच स्थिती आहे. द्राक्ष गेली आहे. कापूस, फळबागा गेल्या आहेत. पण राज्यातील सरकार कुठंय? आसमानी संकट कोसळत असताना हे सुलतान प्रचारात दंग आहेत. छत्तीसगढ, हैदराबाद, जयपूर, निवडणूक पर्यटन सुरू आहे. आम्ही प्रश्न निर्माण केल्यावर हे लोकांच्या भेटी घेत आहेत. आमचे नेते मात्र अगोदरपासून दौरा करत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
शिंदे सरकारवर घणाघात
अवकाळी पाऊस कोसळतोय. विदर्भ, नाशिक, कोकण, ठाणे जिल्ह्यातही मोठं नुकसान झालंय. हे संकट कोसळताना मुख्य सुलतान डेप्युटी सुलतान प्रचारात व्यस्त आहेत. जसं काय हे गेले नाहीत तर निवडणूक थांबणारच आहेत! मुख्य जबाबदारी इथून खोके न्यायची होती. विधानसभा अधिवेशन होईल. प्रश्न निर्माण होतील मग आज गेलेत. इथं राजाच नौटंकी आहे, असं म्हणत राऊतांनी सरकारवर घणाघात केला आहे.
दत्ता दळवी तुरुंगात आहेत.. दोन-चार लोक आले. त्यांनी दळवींच्या गाडीच्या काचा फोडल्या. ही त्यांची मर्दानगी… भाड्यानं माणसं घेतात… दत्ता दळवी बाहेर येतील. जर खरा मर्द असेल तर गाडी फोडून तिथंच थांबा. पळून का जाता थांबा ना तिथं… राज्यात नामर्दांचं सरकार आहे, असं म्हणत राऊतांनी टीका केला आहे.
“…तर तो आनंद दिघेंचाही अपमान!”
या राज्यात दोन कायदे आहेत. गद्दारांसाठी वेगळा कायदा असेल तर तसं जाहीर करा. राज्यपालांना आम्ही विचारतो आहोत. ज्या शब्दामुळे अटक झाली तो शब्द चित्रपटात आहे. दिघे साहेबांच्या तोंडी तो शब्द सेन्सॉरनं कापला का? दळवींना अटक करून तुम्ही आनंद दिघे यांचाही अपमान करत आहात. पोलिसांवर दबाव असल्यानं जामीन प्रक्रियेत उशीर होतोय. हरकत नाही शिवसैनिक तुरुंगात जाऊन मोडत नाहीत. तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. त्यापुढे जात मी म्हणतो की, हजार माराव्यात आणि एक मोजावं! आज तुकोबा असते तर त्यांना देखील यांनी देहू पोलीस कोठडीत पाठवलं असतं, असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे.
