यंदा मान्सून उशिराने सुरु झाला. राज्यात २५ जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार बरसला. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत असताना ऑगस्ट महिन्यात पावसाने सुट्टी घेतली. यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले होते. सप्टेंबर महिन्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला. गणरायाच्या आगमनच्या प्रसंगी राज्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. आता विसर्जन मिरवणुकीत पाऊस असणार आहे. यामुळे गणरायाचे स्वागत आणि निरोपाला वरुणराजाची हजेरी असणार आहे. राज्यात गुरुवारी काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे
राज्यात पुढील चार दिवस पाऊस
राज्यात सर्वत्र चांगला पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर अजून चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागने व्यक्त केला आहे. गुरुवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर इतर अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. जळगाव, नंदुरबार जिल्हा वगळता इतर सर्व ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.
विदर्भात पुढचा आठवडा जोरदार पावसाचा
विदर्भात पुढील पूर्ण आठवड्यात जोरदार पाऊस असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुढील आठवड्यात पाऊस सक्रिय असणार आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळमध्ये पाच दिवस येलो अलर्ट तर इतर जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात नुकतेच अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झाला आहे.
