महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री बनले आहेत. आमदारांच्या बंडखोरीनंतर आता काही खासदारही उद्धव गटाच्या विरोधात उभे ठाकताना दिसत आहेत. भाजपच्या एका नेत्याने तर शिवसेनेचे १९ पैकी १२ खासदार पक्ष बदलण्यास तयार असल्याचा दावा केला आहे. तर शिवसेनेच्या काही खासदारांनी उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांच्याशी समेट करण्याची शिफारस केली आहे. पण ते होईल का, हा मोठा प्रश्न आहे.
वास्तविक शुक्रवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या बैठकीत शिंदे गटाला जुळवून घेण्याचा सल्ला देण्यात आला. बंडखोर गटासोबत राहणे शिवसेनेच्या भवितव्यासाठी फायद्याचे ठरेल, असे उद्धव यांच्यासोबतच्या बैठकीत सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
उद्धव ठाकरेंवर काय म्हणाले एकनाथ शिंदे?
उद्धव गटाला एकत्र आणण्याचा प्रश्नही एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सोबत आणण्याचा प्रयत्न करणार का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, निर्णय काहीही असोत, ५० आमदारांशी बोलूनच पावले उचलू. एकनाथ शिंदे म्हणाले, सध्या आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करत आहोत. महाराष्ट्राला मजबूत सरकार देणार. पुढे जसे होईल तसे बघू, पुढे जे काही निर्णय होतात, ते प्रत्येक पाऊल आमच्या 50 आमदारांशी बोलूनच उचलले जाईल.
