केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या राजकीय लढाईत नवा ट्विस्ट आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) राणेंच्या जुहू बंगल्यातील बेकायदा बांधकामाचा आरोप करत चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. यामध्ये बंगल्यातील बेकायदा बांधकामाचा अंदाज घेऊन त्याची फेरतपासणी व मोजमाप करून घेण्याचे सांगण्यात आले आहे. बीएमसीमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे या कारवाईला राजकारणाशी जोडून पाहिले जात आहे.
मुंबई महानगरपालिका (एमएमसी) कायदा, 1888 च्या कलम 488 अंतर्गत के-पश्चिम प्रभाग (अंधेरी पश्चिम) च्या अधिकाऱ्याने जारी केलेली नोटीस गुरुवारी नारायण राणे यांच्या घराबाहेर चिकटवण्यात आली. त्यात म्हटले आहे की के-पश्चिम प्रभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाचे एक पथक शुक्रवारी जुहू तारा रोड येथील ‘आधीश बंगला’ला भेट देईल आणि बंगल्याची पुन्हा पाहणी करेल आणि अहवाल सादर करेल. नोटीसमध्ये इमारत मालकाला बंगल्याचा प्रस्ताव आराखडा, पास केलेला नकाशा आणि संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
आरटीआय कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून कारवाई
माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्या तक्रारीनंतर बीएमसीने ही कारवाई केली आहे. बंगल्याच्या बेकायदा बांधकामाबाबत यापूर्वी केलेल्या तक्रारींवर बीएमसीने कारवाई केली नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. हा बंगला तटीय कायद्याचे (सीआरझेड) उल्लंघन करून बांधण्यात आल्याचे दौंडकर यांनी सांगितले. हा बंगला समुद्राच्या 50 मीटरच्या आत बांधण्यात आला असून, हा सीआरझेड नियमांचे सर्वात मोठे उल्लंघन असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
संतोष दौंडकर म्हणाले, ‘मी 2017 पासून या बंगल्याविरोधात तक्रार करत आहे, मात्र गेल्या चार वर्षांत बीएमसी कोणतीही कारवाई करत नाही. आता बीएमसी यावर कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे.
संपूर्ण बंगला पाडला जाऊ शकतो: BMC
BMC अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंगल्याची तपासणी केल्यानंतर आम्हाला अनधिकृत बांधकाम आढळल्यास, त्यांना बंगल्याची वैधता सिद्ध करण्यासाठी ठराविक कालावधी देऊन त्यांना आणखी एक नोटीस बजावली जाईल. त्यांनी कायदेशीर कागदपत्रे न दिल्यास ते तोडण्याची कारवाई केली जाईल.”
राणे हे उद्धव ठाकरेंवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत
नारायण राणे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात हल्लेखोर आहेत. मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राणेंना एक दिवस तुरुंगात काढावे लागले. याशिवाय केंद्रीय मंत्री राणेंनी संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला. अशा स्थितीत भाजप याला सूडबुद्धी म्हणत आहे.
